LAC वर तब्बल 25 दिवसांनंतर आता पूर्व स्थिती, मागे हटले चिनी सैनिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर 25 दिवसांनंतर पेट्रोलिंग पॉइंट 17 (हॉट स्प्रिंगचा भाग) वरील चिनी सैनिक मागे हटले आहे. तसेच मागे हटण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच लडाखच्या फिंगर्स भागातून चिनी सैन्य मागे सरकले आहे.

गुरुवारी हॉट स्प्रिंग भागातून चिनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकले आहे. दोन्ही देशांतील करारानुसार, चिनी सैनिक पेट्रोलिंग पॉइंट14, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेट्रोलिंग पॉइंट 17 आणि पेट्रोलिंग पॉइंट 17A भागापासून दोन किलोमीटर मागे सरकले. यानंतर भारतीय सैन्यदेखील या जागांवरून दोन किलोमिटरपर्यंत मागे आले.

पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैनिकांनी एलएसीवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे सुरू झालेला भारत-चीन वाद दोन महिन्यांनंतर संपला आहे. यापूर्वी वादानंतर दोन्ही देशांत सैन्य आणि राजकीय स्तरावर चर्चा झाल्या. 6 जूनच्या कोर कमांडर्सच्या बैठकीत एलएसीवरील अतिक्रमणाच्या वादावर तोडगा काढण्याबाबत सहमती झाली होती. मात्र, गलवानमध्ये झालेल्या हिंसक बाबीमुळे सीमेवरील तणाव अधिक वाढला होता.

एका वरिष्ठ सैन्याच्या अधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय जवान शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटलेत. परंतु अशी आशा आहे की, संवादानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. 6 जूनला कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर 30 जूनला कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.

तत्पूर्वी, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात दूरध्वनीवरून दोन तासांची चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवरून असलेले मतभेद वादामध्ये रूपांतरित होऊ न देण्यावर सहमती झाली होती. तसेच सीमेवर शांतता आणि सलोखा नांदावा यासाठी दोन्ही देशांनी ठरल्याप्रमाणे सैन्य माघार लवकर पूर्ण करावी, असेही ठरले होते.