राहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले – ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब झाल्या’

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 8 : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप सरकार अर्थात मोदी सरकारला घेरले आहे. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवर तणाव कायम आहे. याकडे राहुल गांधी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. आता राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

राहुल गांधी यांनी पुन्हा चीन मुद्द्यावर ट्विट केलं आहे. जेव्हा देश भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या. विजय मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोकसी… हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा समावेश झालाय. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

केरळच्या वायनाडमधून काँग्रेसचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी आता चीनशी संबंधित कागदपत्रांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय. संरक्षण मंत्रालयाच्या दस्तावेजावरून अलिकडेच बराच वादंग आहे. या वादामुळे हे दस्तावेज मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकलेत.

चीन देशासमोर आपण उभे राहू शकतो, हे विसरुन गेले. चीन देशाचं नाव घेण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही. चीनच्या घुसखोरीचे दस्तावेज संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकले आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

चीनच्या घुसखोरी कबुल देत प्रथम संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे ही माहिती आपल्या वेबसाइटवर टाकली होती. पण, राजकीय पातळीवर वाद वाढल्यानंतर हे दस्तावेज वेबसाइटवरून काढले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनातून देशाशी खोटं बोलले का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला होता.

विजय मल्ल्याची संबंधित कागदपत्रं गायब!
पळपुटा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या फाइलशी संबंधित काही दस्तावेज उपलब्ध नाहीत. विजय मल्ल्या खटल्याशी संबंधित महत्वाची कागदपत्रे फाइलमधून गायब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी पुढे ढकलावी लागलीय. आता या खटल्याची सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. याही मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.