लडाख : मागं हटण्यासाठी चीननं ठेवल्या ‘या’ 2 अटी, कदापि मंजूर नसल्याचं भारतानं ठणकावून सांगितलं
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार सीमावाद सोडवण्यासाठी चीनने एक नवी अट ठेवली आहे, जी भारताने नकारली आहे. ही अट चीनच्या चलाखीचा एक भाग होती, जी भारताने ओळखली होती. भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये मे महिन्यापासून सीमावाद सुरू आहे.
पँगोंग सरोवर आणि गलवान खोर्यात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये सातवेळा सैन्य कमांडर स्तरावरील बैठकी झाल्या आहेत. आठव्या टप्प्यातील चर्चेची तारीख अजून ठरलेली नाही. ती 3 नोव्हेंबर असू शकते.
चीनकडून ठेवण्यात आली ही अट
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनकडून अट ठेवण्यात आली आहे की, भारतीय लष्कर फिंगर 3 आणि चीनी लष्कर फिंगर 5 पर्यंत पेट्रोलिंग करतील. म्हणजे एका अटीत चीन भारताची सीमा निर्धारित करत होता, तर दुसरीमध्ये तो आपली सीमासुद्धा स्वत:च ठरवत होता. चीनने म्हटले होते की, जर भारताला ही अट मान्य असेल तर ते फिंगर 4 चे पर्वत आणि पँगोंग सरोवराच्या उत्तर किनार्यावरून आपले लष्कर हटवतील.
याचा थेट अर्थ हा होतो की, वादग्रस्त फिंगर 4 बळकावण्यात आलेल्या अक्साई चीनचा भाग आहे. मात्र, यापूर्वी भारतीय लष्कर फिंगर 8 पर्यंत सुद्धा पेट्रोलिंग करत होते. यासाठी भारताने स्पष्टपणे यास मान्यता देण्यास नकार दिला.
वादग्रस्त एलएसीच्या वेगवेगळ्या बाजूसुद्धा आहेत. चीन म्हणतो की, एलएसी फिंगर चारहून पुढे जाते. तर भारताचे म्हणणे आहे की, एलएसी फिंगर 8 वरील खार्या पाण्याच्या सरोवरावर आहे.