चिंताजनक ! जागतिक ‘कुपोषण’ निर्देशांकात भारत 94 व्या स्थानी, सन 2019 मध्ये होता 102 क्रमांकावर

पोलीसनामा ऑनलाईन : – जागतिक कुपोषण निर्देशांक २०२० अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर असून देशाचा गंभीर श्रेणीत समावेश झाला असून ही देशवासीयांसाठी चिंतेची बाब आहे. याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसंच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. कमी पोषण, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर आदी घटक विचारात घेतले जातात.

२०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ क्रमांकावर होता. २०१८ मध्ये ११९ देशांच्या यादीत भारत १०३ क्रमांकावर होता.जगभरातील स्थिती मध्यम असल्याचा उल्लेख जागतिक कुपोषण निर्देशांकात केला आहे. जगभरातील ६० कोटींहून अधिक लोक कुपोषित असल्याचा इशारा दिला आहे. भारतातील पाच वर्षाखाली मुलांचा मृत्यूदर २००० ते २०१८ दरम्यान कमी झाल्याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे. फक्त १३ देशांमध्ये भारतापेक्षा वाईट परिस्थिती आहे.

देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. भारताला ५० पैकी २७.२ गुण दिले असून परिस्थिती गंभीर श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास परिस्थिती गंभीर नाही. १० ते १९.९ मध्ये गुण असल्यास परिस्थिती मध्यम आहे. २० ते ३४.९ गुण असल्यास भुकेची परिस्थिती गंभीर आहे. ३५ ते ३९.९ गुण म्हणजे धोक्याची घंटा तर ५० हून अधिक गुण म्हणजे धोका खूप असून परिस्थिती भयावह आहे असा होतो. २०२० मधील भारताची कामगिरी तुलनेत सुधारली आहे. भारताला २७.२ गुण असून २००० मध्ये ३८.९, २००६ मध्ये ३७.५, २०१२ मध्ये २९.३ गुण होते.