Coronavirus : देशात 24 तासात ‘उच्चांकी’ 9851 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर सर्वाधिक 273 जणांचा मृत्यु

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून दररोज आदल्या दिवशीपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत़ गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक उच्चांकी ९ हजार ८५१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत़ तर सर्वाधिक २७३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

देशभरातील आतापर्यंत एकूण २ लाख २६ हजार ७७० कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी १ लाख १० हजार ९६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासात देशात सर्वाधिक २७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापूर्वी २९ मे रोजी दिवसभरात २६९ रुग्णांचा मृत्यु झाला होता. आतापर्यंत देशात ६ हजार ३४८ जणांचा मृत्यु झाला आहे.

गुरुवारी दिवसभरात देशातील ४ हजार ३५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत देभरातील १ लाख ९ हजार ४६१ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी गेले आहेत.

देशातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ४८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तसेच रुग्णांची दुप्पट होण्याचे दिवस १६ पर्यंत गेले आहेत.