युजवेंद्र चहलने मोडला २७ वर्षांपूर्वीचा विक्रम 

मेलबर्न : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज मेलबर्न येथे सुरू आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

दोन सामने बेंचवर बसलेल्या यजुवेंद्र चहलने या दोन सामन्याचा वचपा  तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काढला. त्याने १० षटकात ४२ धावा देत ६ कांगारुंना गारद केले. मेलबर्नवर भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. चहलच्या या जादुई फिरकीपुढे कांगारू पार ढासळले. कांगारुंचा सगळा संघ २३० धावातच पॅव्हेलियनमध्ये पोहलचा आहे.

चहलने ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवताना मेलबर्नवर विक्रम केला. अजित आगरकरच्या ( ६/४२) विक्रमाचीही बरोबरी केली. तसेच त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर असलेला २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मुरली कार्तिकने २००७ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद २७ अशी कामगिरी केली होती. त्यानंतर २००४ मध्ये आगरकरने (६/४२) आणि आज चहलने ( ६/४२) यांनी अशी कामगिरी केली. वन डे आणि ट्वेंटी -२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा चहल हा श्रीलंकेच्या अजंटा मेंडिसनंतरचा दुसरा गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. रिचर्डसनची विकेट घेत त्याने रवी शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली. १९९१ मध्ये शास्त्रींनी पाच विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेणारे ते पहिले भारतीय फिरकीपटू होते.

आजच्या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २३० धावांवर सर्वबाद केले आहे. युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी करताना ४२ धावा देताना ६ गडी बाद केले. मालिका विजयासाठी भारताला २३१ धावांची गरज आहे.