रायडु, शंकर, हार्दिकने सावरले भारताला ; न्यूझीलंडला २५३ धावांचे आव्हान

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – पहिल्या १० षटकात ४ बाद १८ अशा अवस्थेतून अमराती नायडु आणि विजय शंकर यांनी केलेली ९८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने केलेल्या झंझावती ४५ धावांमुळे भारताने पाचव्या वन डे मध्ये २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे न्यूझीलंडपुढे २५३ धावांचे समाधानकारक आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फलंदाजांनी योग्य ठरविला नाही. पाचव्याच षटकात रोहित शर्मा तब्बल १६ चेंडू खेळल्यानंतर २ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिखर धवन (६), शुभम गिल (७) आणि धोनी (१) हे एका पाठोपाठ तंबूत परतले. तेव्हा १० व्या षटकात भारताच्या नावावर फक्त १८ धावा लागल्या होत्या. यावेळी चौथ्या सामन्यातील ९२ धावा पार करतील की नाही अशी शंका क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावून गेली. मात्र, त्यानंतर अमराती नायडु आणि विजय शंकर यांनी शांत डोक्याने खेळत तब्बल ९८ धावांची भागीदारी करीत भारताला समाधानकारक स्थितीत आणून ठेवले. विजय शंकरने ४५ धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या केदार जाधव याने ३४ धावांचे योगदान दिले. जाधवच्या जागी आलेल्या हार्दिक पंड्याने नेहमी प्रमाणे आपल्या बॅटीचा पट्टा फिरवत २२ चेंडूत ४५ धावा फटकाविल्या.

पंड्या ४८ व्या षटकात बाद झाला तेव्हा भारताच्या २४८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर २५२ धावांवर भारताचा डाव आटोपला.
मधल्या फळीच्या कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे आव्हान ठेवले असून आता गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर, न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट गोड होऊ शकेल.