‘भारत देश ७० वर्षे ज्या नेतृत्त्वाची वाट पाहत होता ते नेतृत्त्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं’

गांधीनगर : वृत्तसंस्था – भारत देश ७० वर्षे ज्या नेतृत्त्वाची वाट पाहत होता ते नेतृत्त्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं आहे. देश नरेंद्र मोदींच्या हातीच सुरक्षित राहू शकतो असे म्हणत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा आत्मविश्वास भाजापचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. विजय संकल्प सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगरमधून अमित शाह लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली. अमित शाह यांनी सभेला सुरुवात करण्याआधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या या सभेनंतर भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.

विजय संकल्प सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, “देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार आहे. संपूर्ण देशभरातून फक्त नरेंद्र मोदींचंच नाव ऐकू येतं असून पाच वर्षात इतका विश्वास कसा काय निर्माण झाला ? ७० वर्ष देश ज्या नेतृत्वाची वाट पाहत होता ते नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं आहे” असंही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, “देशासमोर आज प्रश्न आहे की देशाला सुरक्षा कोण देऊ शकतं. देशाला सुरक्षा एकच व्यक्ती, एकच पक्ष देऊ शकतो ते म्हणजे नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएचं सरकार.” असे ते म्हणाले. याशिवाय यावेळी बोलताना अमित शाह यांनी मतदारांना गुजरातला संपूर्ण २६ जागा जिंकून देण्याचं आवाहन केलं. पूर्ण बहुमताच्या सरकारचा संकल्प करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.