….तर वर्ल्ड कपमधील भारताचं स्थान धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानमधील संबंध फारसे चांगले नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने झाले नाहीत. पाकिस्तानविरुद्ध न खेळून भारतीय संघाला आतापर्यंत फार आर्थिक फटका बसलेला नाही, परंतु यापुढे तसे केल्यास भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००७ सालापासून एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही. यापूर्वी बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये मालिका खेळवण्याचा करार झाला होता. पण भारतामध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरून बीसीसीआयने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानबरोबर खेळण्यास परवानगी नाकारली आहे.
पाकिस्तानबरोबर आम्ही केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच खेळू शकतो, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पण पीसीबीला मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवायचे आहेत. आता तर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने, भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल असे वक्तव्य केल्याने क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आयसीसीच्या महिला वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध सीरिज खेळायला नकार दिला, तर भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये थेट पात्रता मिळवणे अवघड होऊ शकते.