ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच सुवर्ण

बोस्टवाना : वृत्तसंस्था – बोस्टवाना येथे १५ वी आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताला ५ सुवर्ण तर १ रौप्य पदक मिळाले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पार पडलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये ४४ देशांतील २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभरातील १३०० केंद्रांमध्ये पार पडलेल्या परीक्षांमध्ये ३३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून विविध स्तरावर चाळणी करून अंतिम सहा जणांच्या टीमची निवड करण्यात आली होती. या टीमला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले यानंतर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत जळगाव येथील अमेय देशमुख, दिल्लीतील धनंजय रमण, कोटा येथील मोहित गुप्ता, नमन सिंग राणा आणि इशापूर येथील वैभव राज यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोटा येथील बरून परुआ याने रौप्य पदकावर नाव कोरले. नागपूर येथील हिस्लोप कॉलेजचे प्राध्यापक हेमंत पांडे, भाभा अणुसंशोधन केंद्रातील डॉ. ए. के. राजाराजन आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील निवृत्त प्रा. व्ही. गो. गंभीर या तिघांनी या टीमचे नेतृत्त्व केले.

‘ऑलिम्पियाड’ विषयी –

‘ऑलिम्पियाड’ ही  एक आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी स्पर्धापरीक्षा आहे. ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होईपर्यंतची सगळी जबाबदारी मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे घेतली जाते.या स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच असतात. उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि खगोलविज्ञान व खगोलभौतिकी अशा पाच विषयांवर स्वतंत्रपणे ऑलिम्पियाड स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. आपल्या देशामध्ये ऑलिम्पियाड परीक्षांचा उपक्रम राबवण्यासाठी केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अणुऊर्जा विभाग आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांचं पाठबळ मिळतं. ऑलिम्पियाडसाठी घेण्यात येणाऱ्या या सगळ्या पात्रता परीक्षांचं माध्यम इंग्रजी असतं.