Good News ! ‘या’ उद्योगाला मिळणार नवसंजीवनी, आगामी वर्षात 10 लाख लोकांना रोजगाराची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकट अजूनही गेलेलं नाही. लॉकडाऊन (COVID-19 pandemic lockdown) च्या काळात अनेक उद्योग ठप्प झाले. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. यामुळं फूड इंडस्ट्रीलाही मोठा फटका बसला होता. कारण त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. आता ज्यांच्याकडे नोकरी नाही आणि नोकरीच्या शोधात आहेत अशांसाठी मात्र गुडन्यूज आहे. कामाच्या शोधात आहेत अशा लोकांसाठी लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन कंपनी डाइनआउट ( restaurant table resrvation company dineout) च्या एका रिपोर्टनुसार आता नव्या वर्षात रेस्टॉरंटचा भर हा गमवलेले ग्राहक परत मिळवण्यावर असू शकतो. याशिवाय 90 टक्के रेस्टॉरंट्स आता डिजिटल मेन्यूंचा अवलंब करू शकतात. या रिपोर्टनुसार आता नवीन वर्षात 45 टक्के तरुण वर्ग हेल्थ फूडकडे वळू शकतो. इंडियन फूड सर्व्हीसेस इंडस्ट्रीत आता नवीन वर्षात 10 लाख नवे रोजगार निर्माण होऊ शकतात.

डाइनआउटचे सीईओ अंकित मल्होत्रा यांनी सांगितलं की, कोरोना संकटामुळं देशातील फूड सर्व्हीसेस इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. परंतु आता मात्र हा उद्योग थोडा सावरत आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस 2021 मध्ये नव्यानं जवळपास 10 लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कमालीचा बदलला आहे. हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाऊड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून टेकअवे आणि होम डिलीव्हरी यांचं प्रमाण वाढत आहे.

होम डिलीव्हरीत 30 टक्के वाढ होऊ शकते

डाइनआउटच्या रिपोर्टमध्ये नमदू केल्यानुसार 2021 मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलीव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये 15 टक्के तर डिलीव्हरी ऑर्डरमध्ये 30.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीनं वाढण्याची शक्यता असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

70 लाखांहून अधिक लोकांना दिली होती रोजगाराची संधी

गेल्या काही महिन्यात कोरोना लॉकडाऊनमुळं ज्या व्यवसायांची बिकट अवस्था झाली होती त्यात रेस्टॉरंटचा देखील समावेश आहे. लॉकडाऊननंतर अनेक नियमांचं पालन करून हा उद्या कसाबसा उभा राहिला आहे. या क्षेत्रानं कोरोना संकट येण्याआधी 70 लाखांहून अधिक लोकांना रोजगाराची संधी दिली.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (National Restaurant Association Of India- NRIA) आकडेवारीनुसार, लॉकडाऊनमुळं 30 टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीयर बार असे आहेत जे कायमस्वरूपी बंद झाले आहेत. एका हिंदी वृत्तानं याबाबत माहिती दिली आहे.