भारतीय मुस्लिम जगात सर्वात जास्त समाधानी, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत हा सगळ्यांचा देश असून येथे राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. केवळ स्वार्थी लोकच कट्टरतावाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात, कारण त्यातच त्यांचा स्वार्थ असतो. भारतीय मुस्लिम हे जगात सर्वाधिक समाधानी आहेत, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. ते एका साप्ताहिकाला मुलाखत देताना बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, जेव्हा केव्हा भारतीय संस्कृतीवर हल्ला झाला तेव्हा सगळ्याच जाती, धर्माचे लोक एकत्र आले हा इतिहास आहे. मुगल शासक अकबर याच्याविरुद्ध जेव्हा महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकांची संख्याही खूप मोठी होती असंही ते म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले, एखाद्या देशावर राज्य करणारा परदेशी धर्म अजुनही अस्तित्वात असल्याचे उदाहरण केवळ भारतात पहायला मिळत आहे. पाकिस्तान अजुनही इतर धर्मियांना समान अधिकार नाहीत. भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचेच म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे राज्यघटनेत म्हटलेले नाही. कारण आपली संस्कृती हिंदू आहे.

ते पुढे म्हणाले, कोण कुठल्या ईश्वराची पूजा करतो किंवा त्याची जीवनपद्धती काय आहे याचा हिंदू असण्याची काहीही संबंध नाही. इथे प्रत्येकाला आपल्या श्रद्धेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. धर्म हा तोडणारा नाही तर सर्वांना एका समान धाग्यात जोडणारा आहे.

देशाची प्रगती साधायची असेल तर सर्व समाजाने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. के काम केवळ सरकारचे नाही. आयोध्येतील राममंदिराबाबत मोहन भागवत यांनी आपले मत मांडताना म्हटले की, अयोध्येतील राम मंदिर हे फक्त दगड विटांचे मंदिर नसून ते राष्ट्रीय भावनांचे मंदिर आहे, मानवतेचे मंदिर आहे.