पाकिस्तान नव्हे तर भारतीय अणवस्त्रांच्या निशाण्यावर आहे ‘हा’ देश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताने आपल्या अणवस्त्र सुरक्षा रणनितीमध्ये बदल केला आहे. पाकिस्तान हा भारतीय अणवस्त्रांच्या कायम निशाण्यावर असायचा. मात्र, चीनसोबत झालेल्या वादानंतर भारताने आपल्या सुरक्षा योजनेत बदल केल्याचा दावा अमेरिकन थिंकटँकने आहे.

२०१७ साली डोकलाममध्ये भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताने अणवस्त्र रणनितीनुसार चीनवर लक्ष केंद्रित केल्याचं बुलेटिन ऑफ एटॉमिक सायंटिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलं आहे. तसेच भारत कमीत कमी तीन शस्त्रांची निर्मिती करत असून चीनविरुद्ध मोठे बळ मिळणार आहे. भारताने १५० ते २०० अणुबॉम्बसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लुटोनियमचा साठा करुन ठेवला असल्याचा दावा या अहवालाचे लेखक हेन्स एक्रिस्टेंट आणि मॅट कोर्डा यांनी केला आहे. चीनची राजधानी बीजिंगही भारताच्या निशाण्यावर आली आहे. या अहवालानुसार, भारताजवळ अणुबॉम्ब फेकण्याची क्षमता असणारी आठ क्षेपणास्त्रे आहेत. त्यात हवेतून हल्ला करण्यास सक्षम असलेली दोन जमिनीवरुन हल्ला करता येणारी ४ बॅलेस्टीक क्षेपणास्त्र आणि दोन समुद्र आधारित बॅलेस्टीक क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे.

चीन जमीन, हवा आणि समुद्रातून डागण्यात येणाऱ्या अणवस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करत असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे भारताने देखील पाकिस्तान आणि चीनच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असून अणवस्त्रांची संख्या वाढवत आहे. अणवस्त्रां संदर्भात जगभरातील घडामोडींवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था ‘सिप्री’ च्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली.

चीन आणि भारताने मागील वर्षीच आपल्या अणवस्त्र साठ्यात वाढ केल्याचं अहवालात सांगितलं आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे १५० आणि चीनकडे ३२० अणुबॉम्ब आहेत. मागील एका वर्षात चीनने ३० आणि भारताने १० अणुबॉम्बची निर्मिती केली आहे. तर पाकिस्तानकडे भारताच्या तुलनेत अधिक १६० अणुबॉम्ब असल्याचं समोर आलं आहे.