‘या’ तारखेपासून रेल्वेच्या तिकीट ‘रिझर्व्हेशन’चे नियम बदलणार ; प्रवाशांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सर्वाधिक प्रवास हा रेल्वेनं केला जातो. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या १ मे पासून रेल्वेच्या तिकीट आरक्षण (रिझर्व्हेशन) मध्ये मोठा बदल होणार आहे. ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. मात्र अशी तिकीटं रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.

असा असेल नवीन नियम –

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी २४ तासांवरून ४ तासांवर आणला आहे. ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. सध्या अशा प्रकारे आरक्षित तिकिटाचं बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही. बोर्डिंग स्टेशनमध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. परंतु आय-तिकिटावर आपल्याला ऑनलाइन बोर्डिंग पॉइंट बदलण्याचा पर्याय मिळणार नाही. तात्काळ तिकीट बुक केल्यावरही बोर्डिंग स्टेशन बदलता येणार नाही.

अटी –

प्रवासादरम्यान बोर्डिंग स्टेशन बदललं आणि त्यानंतर ते तिकीट रद्द केल्यास त्यावर रिफंड मिळणार नाही. परंतु एकदा बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यास पूर्वीच्या बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडता येणार नाही. तरीही प्रवाशानं बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतरही आधीच्याच बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास केल्यास त्याला दोन्ही स्टेशनवरच्या तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत.