फूड अँड पॅकेजिंग हल्दीरामवर सायबर अटॅक, करण्यात आली लाखोंची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रसिद्ध फूड अँड पॅकेजिंग कंपनी हल्दीरामवर (Haldiram) सायबर हल्ल्याची (Cyber Attack) झाल्याचे समोर आले आहे. या बद्दल कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर हल्लेखोरांकडून कंपनीच्या अनेक विभागातील डेटा डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीला मोठा फटका सहन करावा लागत आहे. डेटा परत करण्यासाठी सायबर हल्लेखोरांकडून ७ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूड अँड पॅकेजिंग कंपनी हल्दीरामचं कॉर्पोरेट ऑफिस नोएडामध्ये आहे. कंपनीचा आयटी विभाग ह्याच कॉर्पोरेट ऑफिसमधून काम करत असतो. 12 आणि 13 जुलैच्या रात्री कॉर्पोरेट ऑफिसच्या सर्व्हरवर व्हायरस अटॅक करण्यात आला होता. या व्हायरस अटॅकने कंपनीच्या मार्केटिंग बिझनेसपासून ते इतर अनेक विभागांचा डेटा गायब केला आहे. तसेच अनेक विभागांचा डेटा डिलिटही केला आहे.

कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या अनेक फाईल्सही गायब झाल्या आहेत. उच्च अधिकाऱ्यांना फाईल्स गायब झाल्याची माहिती समजताच अंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान सायबर हल्लेखोरांकडून चॅटद्वारे ७ लाखांची मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कोविडच्या काळात, जुलै महिन्यात जगभरातील अनेक कंपन्यांवर व्हायरस अटॅक करण्यात आला होता. त्यादरम्यान हल्दीराम कंपनीवरही हा हल्ला झाला होता. या प्रकरणी कंपनीचे आयटी प्रमुख अजीज खान यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.