जिद्दीला सलाम ! अपघातात दोन्ही हात गमावले मात्र ‘अर्जुन’सह अनेक पुरस्कार कमावले, महाराष्ट्राच्या ‘ स्वीमर’ची कहाणी

पोलीसनामा ऑनलाईन, पंढरपूर, दि. 23 ऑगस्ट : करमाळ्यातील सुयश जाधव याने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपघातात दोन्ही हात गमावले असतानाही त्याने ’अर्जुन पुरस्कारा’सह अनेक पुरस्कार कमावले आहेत. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. त्याच्याविषयी…

सुयश बारा वर्षाचा असताना एका लग्नात गेला होता. यावेळी त्याला विजेचा झटका बसला. यात भाजलेले दोन्ही हात त्याला गमवावे लागले. वडील क्रीडाशिक्षक. त्यामुळे त्यांना सुयशला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते. मात्र, दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे वाटू लागलं. याची जाणीव सुयशला होती. त्याने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगली. त्याच्या या अफलातून प्रवासातून त्याला अफलातून यश मिळाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी सुयश जाधवची निवड झाली. अन् वडिलांना स्वप्नपूर्तीची मोठी भेट मिळाली. आता सुयशचे लक्ष आहे टोकियो ऑलिम्पिकचे. यात पात्र होऊन देशासाठी सुवर्ण मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाला त्याने सुरुवात केलीय.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील भाळवणी एक छोटेसे गाव आहे. याच गावातील अपघातात दोन्ही हात गमवाव्या लागलेल्या सुयश जाधवची ही आहे कहाणी. वडिलांच्या इच्छाशक्तीमुळे फोगट भगिनींनी कुस्तीमध्ये इतिहास रचला तशीच कहाणी या सुयश जाधवची काहीशी आहे. कोरोना विषाणुमुळे सध्या शेतात राबणार्‍या सुयश जाधवला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय. सोलापूरच्या इतिहासात पहिल्या अर्जुन पुरस्काराची नोंद झालीय ती सुयशच्या रूपाने. पण, गावात नाही तर तालुक्यातही अजून कोणाला याबाबत माहित नसल्याने जाधव कुटुंब शेतावरील झोपडीत निवांत असलेले पाहायला मिळाले.

वडील नारायण जाधव उत्कृष्ट जलतरणपटू
सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले आहेत. त्यांनी राज्यात आणि देशात अनेक पुरस्कार मिळविले आहेत. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना यात करिअर करता आले नाही. ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. यावेळी त्यांचा लाडका मुलगा सुयशलाही चांगला जलतरणपटू बनवून त्याला देश-विदेशात खेळण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न त्यांनी पहिले होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते आणि 2004 साली विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात कापावे लागले होते. आता पोहणे सोडावे पण, त्याने जगायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना एकदा हात गमावल्यावर त्याला सफाईदारपणे पोहताना वडिलांनी पहिले होते. आणि त्यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली.

आजवर 111 पदकांची केलीय कमाई
राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके पटकावित गेला. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केलीय. 2016 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिलाय. त्याची सर्व कामगिरी पाहून भारत सरकारने सुयशाला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केलाय. त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.

सुयश जाधव सध्या आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत
सध्या कोरोना विषाणूमुळे पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश आपल्या शेतातील झोपडीमध्ये कुटुंबासमवेत राहत आहे. सकाळी उठल्यापासून शेतात वडिलांसोबत काम करणे आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टी त्याला सध्या करता येत आहेत. याचठिकाणी त्याला अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमीही समजली. अन् कुटुंब या आनंदात हरवून गेले. वडिलांनी पेढा भरवीत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला. तर सुयशने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत त्यांच्या जिद्दीला वंदन केले. पाण्यासोबत गट्टी जमलेला सुयश गेल्या 5 महिन्यापासून टँक आणि जिम बंद असल्याने पोहण्यापासून दूर गेलाय.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण मिळवून देण्याचे स्वप्न
यात त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण मिळवायचे स्वप्न खुणावू लागलंय. अशावेळी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने 6 स्वीमरना दुबईत जाऊन ट्रेनिंगची सोय केलीय. त्याच पद्धतीने 3 पॅरा स्वीमरसाठीही दुबईमध्ये सोया करण्याची मागणी सुयश जाधवने केलीय. यामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाची सर्वोत्तम कामगिरी होईल, अशी अपेक्षा सुयश व्यक्त करत आहे. सोलापूर जिल्ह्यात जाहीर झालेला हा पहिलाच अर्जुन पुरस्कार असून 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार मिळालाय. अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्यात कोणत्या प्रतिभा आहे. त्याला वाव दिल्यास जीवनात हमखास यश मिळते, असा संदेश सुयश जाधव आपल्या इतर अपंग बांधवाना देऊ इच्छित आहे.