आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले , तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तब्बल ३६ वर्षानंतर महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी होती. मात्र, जपानने जोरदार बचाव करत दोन गोल केले. तर भारताला एकच गोल करता आला.तिसऱ्या सत्रात जपानने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल निर्णयाक ठरला. या विजयासह जपानच्या महिलांनी २०२० साली आपल्याच देशात होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.
भारताचा संघ पहिल्या सत्रात पिछाडीवर होता. पहिल्या सत्रात जपानने १-० अशी आघाडी कायम राखली होती.दुसऱ्या सत्रात भारताने आपले खाते उघडले आणि जपानबरोबर १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या नेहा गोयलने २५ व्या मिनिटाला गोल केला.
तिसऱ्या सत्रात जपानला दुसरा पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या दुसऱ्या पेनेल्टी कॉर्नरचाही जपानने चांगला फायदा उचलला. जपानच्या मोटोमी कावामुराने गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. जपानच्या महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला.