भारत-चीन सैनिकांत पुन्हा संघर्षांची शक्यता !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

गलवान खोर्‍यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या 45 वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी 1993 मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोर्‍यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.

याबाबत माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी सांगितले की, “जर सैन्यमाघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गलवानमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.”असे त्यांनी सांगितले.