मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानला ‘इशारा’, नरेंद्र मोदींबद्दल ‘तोंड’ सांभाळून बोला

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान एकाकी पडला आहे. अशातच भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्रांनीच फटकारले आहे. सौदी अरेबियाचे उप परराष्ट्रमंत्री अदेल अल-जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल-नह्यान या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या देशांच्या प्रमुखांच्या वतीनं देण्यात आलेला संदेश पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे.

काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्रांनीच खडे बोल सुनावले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला, अशा सूचना मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना केल्या आहेत. दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेतून सोडवा, असा सल्लादेखील मुस्लिम राष्ट्रांनी खान यांना दिला.

पाकिस्तान एकाकी –
कलम 370 हटल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर उपस्थित करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर संयुक्त राष्ट्रानंही पाकिस्तानच्या मध्यस्थीची मागणी नाकारली आहे. अमेरिका, चीननंतर आता मुस्लिम राष्ट्रांनीही पाकिस्तानच्या पाठिशी न राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.