IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

पोलीसनामा ऑनलाईन :- इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 14 व्या पर्वातील सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी नुकतीच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना राज्य सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन दिले. राज्यात व मुंबईत कोरोना वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशात मुंबईत आयपीएल सामने होणार नसल्याची शक्यता कमी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय व आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त cricbuzz ने दिले आहे.

बीसीसीआयने यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबईबद्दल अंतिम निर्णय होईल, असे बीसीसीआयने सांगितले. बैठकीत प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही, यावरही चर्चा झाली. अहमदाबाद किंवा चेन्नई प्रमाणे 50 टक्के चाहत्यांना परवानगी मिळावी या मुद्द्यावर चर्चा झाली, असे एका सदस्याने cricbuzz ला सांगितले.

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या मान्यतेनंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. पंरतु अद्याप बैठकीची तारीख ठरली नाही, येत्या काही दिवसांत गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान हैदराबाद, जयपूर आणि मोहाली या शहरांचा आयपीएल सामन्यांसाठी विचार करण्यात यावा, यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत आहे.