IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार; दिलं ‘हे’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत पसरलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण पुढे केले आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत.

मुंबई पोलिसांनी टेलिफोन टॅपिंग प्रकरणात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी रेश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी आज २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे समन्स बजावले होते. याबाबत रश्मी शुक्ला यांनी काल रात्री उशिरा पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक ई मेल पाठविला आहे. तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप यांनाही हा ई मेल पाठविला आहे.

त्यात त्यांनी मुंबई व हैदराबाद येथे कोविड वाढत असल्याच्या कारणामुळे प्रत्यक्ष प्रवास करता येणार नाही़ तसेच आपल्याकडील अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या आपल्याला प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही, असे त्यांनी या ई मेलमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर, जो गुन्हा दाखल झाला आहे. त्या एफआयआरची कॉपी पाठवा. आपली प्रश्नावली ई मेलमार्फत पाठवावी. त्याला आपण ई मेलमार्फत उत्तर देऊ असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

यावर आता मुंबई पोलीस काय भूमिका घेणार, त्यांना पुन्हा समन्स पाठविणार की प्रश्नावली पाठविणार, हे लवकरच स्पष्ट होईल. एसआयडी मध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोपी रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रविघातक कृत्य करणार्‍यांच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन रश्मी शुक्ला यांनी मंत्र्यांचे फोन टॅप केले. तसेच राज्यात भाजपचे सरकार यावे, यासाठी काही आमदारांना धमकावले़ अपक्ष आमदारांना फोन करुन भाजपला पाठिंबा देण्यासाठी धमकाविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.