दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – आरोग्य विमा पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आरोग्य विमा प्रदात्यांना पॉलिसीधारकांच्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. हे निर्देश आरोग्य विमा तसेच वैयक्तिक अपघात विमा आणि ट्रॅव्हल विम्यास लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे पॉलिसीधारकांच्या खिशावरचा भार कमी होऊन पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.

आयआरडीएआयने परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण आणि स्वतंत्र आरोग्य विमाधारकांना विद्यमान पॉलिसीत फायदे जोडण्याची किंवा त्यात बदलाची परवानगी राहणार नाही. ज्यामुळे प्रीमियममध्ये वाढ होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये जाहीर झालेल्या आरोग्य विमा व्यवसायातील उत्पादन प्रस्तावित करण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपन्यांना किरकोळ बदल करण्याची परवानगी असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या फायद्यांव्यतिरिक्त कोणताही नवीन लाभ अतिरिक्त कव्हर किंवा वैकल्पिक कव्हर म्हणून देता येईल. तसेच नियामकाने प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व आरोग्य विमा उत्पादनांच्या आर्थिक व्यवहार्यतेचा आढावा घेण्यासाठी अ‍ॅक्युटरी नियुक्त करण्यास सांगितले आहे. तसेच विमाधारकांना पॉलिसीचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सोप्या शब्दांचा वापर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून पॉलिसीधारकांना ते सहज समजू शकेल. या वर्षाच्या 1 ऑक्टोबरपासून विमाधारकांना पॉलिसीधारकांचे लक्ष वेधण्यासाठी स्पष्ट करारांसह पॉलिसी कॉन्ट्रॅक्टचे प्रमाणित स्वरुपाचे अवलंबन करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.