पर्दाफाश ! काश्मीरमध्ये ‘पुलवामा-2’ घडवण्याचा ISI चा ‘कट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – काश्मीरमध्ये पुन्हा एका घातपात करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा सदृश हल्ला करण्याचा कट होता. आयएसआयकडून काही निवडणक दहशतवाद्यांना एकत्र करत एक दहशतवादी गट तयार करण्यात आला आहे. या गटाचे नेतृत्व जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडे देण्यात आले असून या गटाला ‘गजनवी फोर्स’ नाव देण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश, लष्कर आणि अंसार गजवत – उल – हिंद या संघटनांनी मिळून सुरु केलेला हा नवा दहशतवादी गट काश्मीरमधील भारतीय सुरक्षारक्षकांवर आयईडी स्फोटकांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराकडून या संबंधित हायअलर्ट जारी केला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच महिन्यात 14 तारखेला पुलवामा येथील सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात भारताचे बसने प्रवास करणारे 40 जवान शहीद झाले होते. या घातपातानंतर चौकशीनंतर भारताने पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याच्यासह त्याच्या 4 साथीदार दहशतवाद्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या चौघांवर देशात दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप लावला आहे.