महाविकास आघाडीत कॉंग्रेसची कोंडी ! निधीबाबत होतोय दुजाभाव, खुद्द प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिली कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   लोकांनी वीज वापरली तर बिल भरावेच लागेल, वीजबिलात माफी अथवा सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, राऊतांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्र्यांसोबत दुजाभाव केला जातो, त्यांच्या खात्यांना निधी दिला जात नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खात्यांना निधी मिळतो, पण काँग्रेसच्या खात्यांना निधी मिळत नाही, अशी तक्रार काँग्रेसने केली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीदेखील अशीच तक्रार केली होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरे आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतो, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू, काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असेही ते म्हणाले. पण दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर केले गेले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवे होते, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मात्र, निधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, हा फार मोठा विषय आहे असे वाटत नाही, एखाद्या वेळेस निधी कमी मिळाला असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करता येईल. निधीबाबत किती लोकांना फायदा होईल हे पाहून निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनामंत्री अनिल परब म्हणाले. मात्र, आज कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 वर्षांत जितके बिल येत नाही तेवढे 3 महिन्यांत : फडणवीस

महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल, असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, यानंतरही जनतेला अवाजवी बिले आली आहेत. एखाद्याने त्याच्या घरातली सर्व उपकरणं 24 तास वापरली तरीही 5 वर्षे जितके बिल येणार नाही, तितक्या रकमेचे बिल 3 महिन्यांत आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसेही आक्रमक, रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

वीजबिल वसुली करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वीजबिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळे झाले आहे. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण “लाथो के भूत बातों से नही मानते,” अशा शब्दांत येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.