मुंबईचा लचका तोंडण्यासाठी देशात काही लोक टपून बसलेत : जितेंद्र आव्हाड

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील विविध भागासह मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने विरोधकांकडून त्यावरून टीका केली जात आहे.  विशेषतः मुंबईवर होत असलेल्या टीकेचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. देशातील काही लोक मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसले आहेत. मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम केले जात असल्याचा आरोप केला आहे.

कोरोनामुळे मुंबई मागील दीड महिन्यांपासून ठप्प असून तेथील रुग्णसंख्या 12 हजारांच्या वर पोहोचली आहे.  केंद्र सरकारनंही मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे  कोरोनावरून राजकारणारही सुरू असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

विरोधकांकडून होणार्‍या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. आव्हाड यांनी ट्विट करून मुंबईतील स्थितीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोपांवर भाष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे.  मुंबईचा लचका तोंडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात असून  त्यांचे घर आपल्या बाजूलाच असल्याचे म्हटले आहे.