वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे ‘पप्पू स्ट्राइक’ ; डाव्यांचा राहुल गांधींना टोला

तिरुवनंतरपुरम : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ते आपल्या पारंपारिक अमेठी मतदारसंघ आणि दक्षिणेतील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतेला निर्णय डाव्यांना फारसा रुचलेला नाही. सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे ‘पप्पू स्ट्राइक’ असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तर केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पी. विजयन यांनीही काँग्रेसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे केरळमधील २० पैकी एक जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही.

आम्ही त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणाहून निवडणूक लढवायची होती तर त्यांनी ज्या ठिकाणी भाजपचा उमदेवार आहे, त्या ठिकाणाहून निवडणूक लढवायला हवी होती. काँग्रेसने राहुल गंधी यांच्याबाबत घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुरकारलेला थेट लढा असल्याचे विजयन म्हणाले होते. तसेच प्रकाश करात यांनी देखील काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली आहे.

दरम्यान, आज सीपीएमच्या मुखपत्रातूनही काँग्रेसच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ”राहुल गांधींचा वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय म्हणजे पप्पू स्ट्राइक आहे. केरळ सोडून संपूर्ण भारतात काँग्रेसची सीपीएमसोबत आघाडी आहे.” असे सीपीएमचे मुखपत्र देशाभिमानी या वृत्तपत्राने म्हटले आहे.