‘भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझ स्पष्ट मत’ – जितेंद्र आव्हाड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंबरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, येथील महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आपले ठाण्याचे खासदार कधी आले इकडे, कुणी सांगेल का ? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवरही टीका केली. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन एकेकाळी ज्येष्ठ कलावंतांपासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चिडीचूप आहेत. भाजप सरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे सांगत हे सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, आपल्यावर श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे भुलभुलैया करण्याचं काम करतात, मोदी सरकारने देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा धडाका लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ज्या संविधानामध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलाय, त्यांच संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करीत आहे. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय ? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्या समवेत उपस्थित होते. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.