Sangli News : पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते – प्राचार्य यशवंत पाटणे

सांगली (Sangli) : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली (Sangli) जिल्ह्याने महाराष्ट्राच्या इतिहासाला पंचपीठे दिली आहेत. यात यशवंतराव चव्हाण हे विचारपीठ, वि. स. पागे हे संत शक्तिपीठ, वसंतदादा पाटील हे लोकपीठ, आर. आर. पाटील हे शांतिपीठ, तर डॉ. पतंगराव कदम ( Dr. Patangrao Kadam)  हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते, असे पाटणे म्हणाले. मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त पाटणे यांचे व्याख्यान झाले.

कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात प्राचार्य यशवंत पाटणे यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना पाटणे म्हणाले की, पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात विकासपर्व उभे केले. त्यांनी समाजहिताचा विचार कृतीत आणताना निर्धार आणि निर्भयता दाखवली. कामाची सचोटी आणि माणसे सांभाळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. यावेळी प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख नितीन माने, आदी उपस्थित होते.