पुलवामाचा मास्टरमाईंडची रावळपिंडीत ISI सोबत गुप्त बैठक, भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

पोलिसनामा ऑनलाईन – भारतात आतापर्यंत वेगवेगळे दहशतवादी हल्ले घडवून आणणार्‍या जैश-ए-मोहम्मद आणि आयएसआयच्या अधिकार्‍यांमध्ये पाकमधील रावळपिंडीत गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. जैश-ए-मोहम्मदची सूत्रे संभाळणारा अब्दुल रौफ असगर आणि आयएसआयच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीची माहिती मिळाल्यापासून भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

अब्दुल रौफ असगरचा भाऊ मौलाना अम्मारही या बैठकीला उपस्थित होता. अब्दुल रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर मौलाना अम्मारने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यात त्याने इंडियन एअर फोर्सचे फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. जैशच्या तालीम-अल-कुरान मदरशाला लक्ष्य केल्याबद्दल बदला घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. इस्लामाबादच्या जैश मरकजमध्ये जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी झरार यांच्यात भारतावरील हल्ले तीव्र करण्याच्या योजनेसंबंधी बैठक झाली होती. त्यानंतर आता रावळपिंडीमध्ये अब्दुल रौफ असगर आणि आयएसआयच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये बैठक झाल्याचे गुप्तचर अधिकार्‍याने सांगितले. ही बैठक यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्याच्या महिनाभरआधी याच लोकांमध्ये अशाच प्रकारची बैठक झाली होती.