दुर्देवी ! वेगानं 3 मित्रांचं ‘जीवन’ संपवलं, अपघातात झाले ‘ठार’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाऱ्याशी स्पर्धा करत भरधाव वेगात जाणाऱ्या दुचकीची धडक एका व्हॅनला बसली. समोरासमोर झालेल्या धडकेत जयसिंगपुरमधील तीन तरुणाचा मृत्यू झाला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हॉटेलसमोर हा अपघात झाला. या अपघातात सरोज तानाजी पोवार (वय-20 रा. मोरवाडी, ता. करवीर), शिवकुमार सातप्पा मरेन्नवार (वय-19 रा. निमशिरगाव, ता. हातकलंगले), आकाश तानाजी कदम (वय-20 रा. जयसिंगपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मित्रांचा ग्रुप स्पर्टस बाईकवरून पन्हाळ्याच्या दिशेने जात होते.

मित्रांचा ग्रुप स्पोर्टस बाईकवरून पन्हाळ्याच्या दिशेने दुपारी एकच्या सुमारास भरधाव वेगात जात होते. नलवडे बंगल्याजवळ त्यांचा बाईकला एका व्हॅनची समोरासमोर धडक बसली. या धडकेत सरोज व शिवकुमार हे लांब फेकले गेले. या अपघातात ते जखमी झाल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. आकाशला इतिहासाची आवड होती. त्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे वाचन दांडगे होते. त्याच्या दुचाकीवर ध्येयवेडा आयएएस असे लिहले होते.

जयसिंगपूरमधील महाविद्यालयीन तरुणांचा एक ग्रुप नेहमी पर्यटनासाठी जात होता. विशेषत: ऐतिहासिक ठिकाणी, गड-किल्ल्यांवर जाण्याचा त्यांचा आवडीचा विषय होता. आज रविवारमुळे सुट्टी असल्याने त्यांनी पन्हाळा येथे जाण्याचे ठरवले होते. पन्हाळ्याच्या दिशेने जात असताना त्यांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नसल्याने तिघांनाही आपला जीव गमवावा लागला.