मौत का कुवा ! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत, 2 दिवसांत दोन अपघात; मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना जामवाडी येथे घडली होती. यानंतर आज (रविवार) पहाटेच्या सुमारास आणखी एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार या विहिरीत पडली. यामध्ये मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेसहा वाजता झाला. दोन दिवसांत दोन अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

आरती गोपाल फांदडे (वय-30) आणि माही गोपाल फांदडे (वय-4 रा. सिंगडोह, ता. मानोरा, जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या माय-लिकींची नावे आहेत. तर गोपाल विठ्ठल फांदडे (वय-35), वेदिका फांदडे (वय- दीड वर्ष) आणि जय गुणवंत वानखेडे (वय-17 रा. देवठाणा ता. मानोरा, जि. वाशीम) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फांदडे कुटुंबीय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद-देऊळगाव राजा मार्गावरुन जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरुन अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. या अपघातात आरती फांदडे आणि चार वर्षाच्या माहीचा मृत्यू झाला.

जखमी व्यक्तींना तातडीने जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. रस्ता वळणदार असल्याने चालकाला वळणावर असलेली ही विहिर दिसत नाही. त्यामुळे हे अपघात झाले. वळणावर असलेली ही विहिर धोकादायक बनली असून अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.