सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय, Congress आमदाराचा घरचा आहेर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी करुन करत सरकार स्थापन केले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेसने आपल्याला डावलण्यात येत असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यातच आता काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरीष्ठ आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घातली असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. गेल्या 8 महिन्यापासून नगरविकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचेही पैसे दिले नाहीत, असे गोरंट्याल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, माझ्यासारख्या काँग्रेसच्या 11 आमदरांच्या ताब्यात असलेल्या पालिकांना पैसे मिळालेले नाहीत. ही बाब आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखील ही बाब लक्षात आणून दिली आहे. त्यांनी आम्हाला निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे पालिकेला नक्कीच निधी मिळेल अशी अपेक्षा आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 4 पालिकांचा रद्द करण्यात आलेला निधी पुन्हा मिळावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.