जालना जिल्ह्याला मिळणार 2 मंत्रीपदे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हेच उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासाठी 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपकडून बबनराव लोणीकर आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदं मिळाली होती.

निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं होतं. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा समावेश आहे. त्यामुळे ह्या दोघांचा मंत्रीपदासाठी नक्की विचार केला जाऊ शकतो.

राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला मंत्रीमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापनेचा नवीन प्रयोग करण्यात आला. मात्र या आघाडीत मंत्रीपदावरून अद्याप एकमत झाले नाही. मात्र लवकरच नवीन सरकार बनवण्यात येईल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : policenama.com