जामखेड दुहेरी हत्याकांड : उमेशचंद्र यादव-पाटील विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यायातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांचा भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडाचे विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे.

एप्रिल 2018 मध्ये जामखेड तालुक्यातील उल्हास माने यांच्या तालिमीतील काही मुले आणि मयत योगेश आणि राकेश यांचा राजकीय कारणावरून वाद झाला होता. या वादातून जामखेडला दुहेरी हत्याकांड झाले आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, उल्हास माने, त्यांचे बंधू, दत्ता ऊर्फ स्वामी गायकवाड या सर्वांनी इतर आरोपींच्या सहाय्याने या दुहेरी खुनाचा कट रचला. दि 28 एप्रिल 2018 रोजी दिवसाढवळ्या पिस्तुलातून गोळ्या झाडून राळेभात बंधूंची निर्घृण हत्या केली होती.

या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या माने बंधूंनी जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. या घटनेचे स्वरूप पाहून माने बंधू यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहून सर्वोच्च न्यायालयानेही मानेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षाच्या आत निकाली करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने प्रसिद्ध वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. यासंबंधीची अधिसूचना नुकतीच विधी आणि न्याय विभागाने जारी केली आहे. यादव यांच्या नियुक्तीबद्दल पीडित राळेभात कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करून या प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. याबाबत यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या खटल्याचे कामकाज तात्काळ सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे सूचित केले आहे.