पाकिस्तानकडून पुन्हा युद्ध बंदीचे उल्लंघन

श्रीनगर : पाकिस्तान गेले काही दिवस सातत्याने युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर बुधवारी सकाळी साडे सात वाजता छोट्या शस्त्रासह गोळीबार करण्यास सुरुवात करुन युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देत आहे. काश्मीरमध्ये अतिरेक्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबाराचे असे प्रकार केले जातात. त्याला सीमा सुरक्षा दलाकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जात आहे.

गेल्या १५ दिवसात काश्मीरमध्ये २२ दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने यमसदनी पोहचले आहे. त्यात ८ टॉप कमांडर होते. तसेच या वर्षात आतापर्यंत ३६  ऑपरेशनमध्ये एकूण ८८ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. त्यामुळे पाकिस्तान लष्कराकडून ही आगळीक केली जात आहे.