काश्मीरमधील ‘आंतक’वादावर वर्मी घाव ! इतिहासात पहिल्यांदाच चार महिन्यात 4 दहशतवादी संघटनांच्या म्होरक्याचा ‘खात्मा’

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलीस दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात व्यस्त आहेत. रविवारी श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात 3 अतेरिकी ठार झाले. यासर्व प्रकरणाची माहिती आयजी काश्मीर झोनच्या विजय कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, या कामगिरीमुळे मी सुरक्षा दलाचं अभिनंदन करतो कारण इतिहासात पहिल्यांदाच दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना भारतीय सैन्याने 4 महिन्यांत संपवलं आहे. त्यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि गजवत-उल-हिंद या प्रमुखांचा समावेश होता. विजय कुमार पुढे म्हणाले की, यावर्षी भारतीय सैन्याने 106 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांती ठेवणं हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे सुरक्षा दलामध्ये सतत ऑपरेशन सुरु आहेत आणि हे पुढे चालतच राहणार.

IED एक्सपर्टलाच केलं ठार
कुलगाम येथे शनिवारी झालेल्या हल्ल्यात एका दहशतवाद्याची हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यावेळी दोन दशहशतवादी शस्त्रास्त्र सोडून पळून गेले होते. यात ठार झालेला पाकिस्तानी दहशतवादी असून तो आयईडी एक्सपर्ट असल्याचं सांगितलं जात आहे. तर आज ठार झालेल्या दहशतवाद्याकडूनही M-4 आणि AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये काही दहशतवादी घरात लपून बसले असल्याची माहिती हाती लागली होती.

त्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संपूर्ण परिसर घेरला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन करा अशा सूचना दिल्या. तरीही दहशतवादी बाहेर आले नाहीत. त्यामुळे सैनिकांनी कारवाई करत गोळीबार केला आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.  रविवारी श्रीनगरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांमधील दोघांची ओळख पटली आहे तर एका दहशतवाद्याचा तपास सुरु आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाला कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली आहे.