कोल्हापुरात 11 ते 21 सप्टेंबरपर्यंत ‘जनता कर्फ्यू’, निर्बंधांबाबत झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –    कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान 10 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यात प्रशासनाचे काणतेही निर्बंध नसतील. जनतेनंच हा कर्फ्यू यशस्वी करावा असं आवाहन एका संयुक्त बैठकीत करण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून बाधितांचा आकडा 30 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळं आता हा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात बाबत आज 2 बैठका झाल्या. यात प्रथम कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक झाली. या बैठकीत 6 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला. 10 ते 16 सप्टेंबरपर्यंत सुचवण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूला कापड दुकानदारांनी जोरदार विरोध केला. यामुळं बैठकीत काही जण एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला.

या बैठकीतून कापड दुकानदारांनी काढता पाय घेतल्यानंतर अखेर 6 दिवस कर्फ्यू पाळावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेत सायंकाळी महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत काहींनी जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली तर काहींनी याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर 11 ते 21 सप्टेंबर असा 10 दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. परंतु महापालिका अथवा पोलीस प्रशासन यासाठी नागरिकांवर कोणतेही निर्बंध आणणार नाहीत असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. जनतेनं स्वयंस्फूर्तीनं हा जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन महापौर आजरेकर यांनी केलं.

खासदार संभाजीराजे यांनी या कर्फ्यूला कडाडून विरोध केला. सतत कर्फ्यू जाहीर करणं म्हणजे सामान्य जनतेच्या पोटाला चिमटा घेण्याचा प्रकार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यात आधीच जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आता शहरातही तो लागू केल्यानं त्याला काही प्रमाणात विरोध सुरू झाला आहे.