सत्ता गेल्याने भाजपला फस्ट्रेशन आलयं, त्याचे उदाहरण म्हणजे पडळकर : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे. सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेले आहे. भाजप किती अत्यवस्थ झाले आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आलयं हे यातून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, पडळकरांचे बोलणे हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचे वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात त्यांनी पडळकरांवर हल्ला चढवला. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत पडळकर यांनी शुक्रवारीच या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या सगळ्या प्रकारानंतर पडळकरांवर गुन्हाही दाखल झाला आहे.