जेजुरी : (संदीप झगडे) पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा येत्या सोमवारी (दि.२०) होणारा सोमवती अमावस्या यात्रा उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ग्रामस्थ – मानकरी मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले ,मात्र नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते श्रींचे सर्व धार्मिक विधी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि.२०) सोमवती अमावस्या असून सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सोमवती यात्रेनिमित्त खंडेरायाच्या धार्मिक विधीं व नियोजना बाबत जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी ,मानकरी ,सेवेकरी ,देवसंस्थान विश्वस्त पुजारी वर्गाची बैठक पार पडली. यावेळी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे ,सचिव छबन कुदळे ,जालिंदर खोमणे ,रामदास माळवदकर ,संजय खोमणे, कृष्णा कुदळे ,आबा राऊत , अमोल शिंदे,दिलावर मनेर,नंदू मोरे, काशिनाथ मोरे , अविनाश सातभाई, कुंडलिक दावलकर,माजी विश्वस्त सुधीर गोडसे,देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप ,विश्वस्त शिवराज झगडे ,पंकज निकुडे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने आदी ग्रामस्थ मानकरी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जेजुरी शहर व परिसर कॅन्टोन्मेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे. १४ दिवस जेजुरी शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.त्या अनुषंगाने जेजुरी येथील येत्या सोमवारी होणारा सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून परंपरेनुसार क-हास्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे. मात्र नित्य सेवेकरी,पुजारी, मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत .ही संख्या सुद्धा अत्यंत मर्यादित राहणार असल्याचे पेशवे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाला निवेदन देत, सोमवती अमावस्या उत्सवातील धार्मिक विधींसाठी परवानगी घेण्यात येणार आहे असेही पेशवे यांनी सांगितले.
सोमवारी (दि.२०) श्रींच्या उत्सवमूर्ती सजविण्यात आलेल्या चार चाकी वाहनातून क-हा नदीतीरावर प्रस्थान करणार आहेत. नदीतिरावर सुरक्षित अंतर ठेवून नित्य सेवेकरी ,मानकरी ,पुजारी यांच्या हस्ते श्रींच्या उत्सव मूर्तींना अभिषेक ,स्नान घालण्यात येऊन पुन्हा वाहनातून जेजुरीत येत गडकोट आवारात दाखल होणार आहेत,ग्रामस्थ ,मानकरी यांना रोजमुरा घरपोच वाटप होणार आहे.प्रशासन व्यवस्थेकडून ज्या सूचना,मार्गदर्शन होईल त्याचे काटेकोर पालन करून धार्मिक विधी करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले. तर ग्रामस्थ ,मानकरी यांना सुरक्षितते बाबत व धार्मिक विधींबाबत जे सहकार्य व सोयीसुविधा देण्यात येणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले. भाविकांनी जेजुरीत येऊ नये अन्यथा गुन्हे दाखल करणार जेजुरीत सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शहर परिसर कॅन्टोन्मेंट घोषित करण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त कोणीही भाविकांनी शहरात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी बैठकीत सांगितले.