जेजुरी : प्रशासनाचे आदेश प्राप्त होईपर्यंत देवदर्शनासाठी बंदच राहणार

जेजुरी ( संदीप झगडे ) : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर भाविकांना देव दर्शनासाठी १८मार्च २०२०पासून बंद आहे. पुढील काळात देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना बाबत जोपर्यंत प्रशासनाकडून आदेश, सूचना ,मार्गदर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार नाही मात्र श्रींचे नित्याचे धार्मिक विधी सुरू आहेत, ते तसेच सुरू राहणार आहेत .असा खुलासा मार्तंड देवसंस्थान समितीने केला आहे. कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा – यात्रा उत्सवांचा काळ म्हणजे मार्च ते जून असा असून लग्नसराईचे दिवस, शालेय सुट्ट्यांच्या हंगाम ,चैत्र पौर्णिमा , सोमवती यात्रा, या कालावधीत किमान ५० लाखांहून अधिक भाविक जेजुरीत दाखल होऊन कुलधर्म -कुलाचार करीत देवदर्शन घेतात .मात्र यंदाच्या वर्षी महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या “लॉकडाऊन” मुळे राज्यातील कोणीही भाविक जेजुरीत फिरकला नाही .दैनंदिन धार्मिक विधी वगळता देवांचे जत्रा यात्रा उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. एवढेच नव्हे तर ग्रामस्थानाही देवदर्शन बंदच आहे. इतर राज्यातील मंदिरे देवदर्शनासाठी खुली करण्यात येत असल्याने व सध्या राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना जेजुरीच्या कुलदैवत खंडेरायाचे मंदिर भाविकांना देव दर्शनासाठी खुले होणार का? असा प्रश्न राज्यातील भाविकांना पडला असून भ्रमणध्वनीवरून देवसंस्थान व्यवस्थापणाकडे तशी चौकशी होत आहे. त्या अनुषंगाने देवसंस्थान समितीकडून खुलासा करण्यात आला आहे.

एकत्रितरित्या बैठक घेणार –

खंडेरायाचे मंदिराबाबत प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त झाल्यानंतर महसूल (तहसीलदार पुरंदर ),आरोग्य, नगरपालिका ,पोलीस प्रशासनासह पुजारी-सेवेकरी व ग्रामस्थ मंडळाची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेश, सूचना आणि मार्गदर्शन यांची माहिती व त्याची काटेकोर अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे तसेच देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, जंतूनाशक फवारणी , सेनेटायझर, स्वच्छता ,भविकांमधील सुरक्षित अंतर आदी खबरदारीच्या करावयाच्या उपाययोजनाबाबत देवसंस्थान व्यवस्थापन सज्ज करण्यात येत असल्याची माहिती देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.