मोदी जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज येथे सफाई कामगारांचे पाय धुतले. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. या प्रकारावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चातुर्वर्ण्य मानसिकतेचे असून जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे असे म्हंटले आहे.
याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यानंतर त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवत त्यांचा सत्कार केला आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या एकंदरीत प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चातुर्वर्ण्य मानसिकतेचे असून जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे”, असे आव्हाड म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी धुतले सफाई कामगारांचे पाय – प्रयागराज यथे सफाई कामगारांचे पाय धुतल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, कुंभ मेळ्याला भेट देणाऱ्या २२ कोटी लोकांमुळे सफाईचे मोठे आव्हान होते. परंतु, या कर्मयोगिंनी दाखवून दिले की जगात अशक्य काहीच नाही. या कर्मयोगित प्रयागराजचे लोक, नाविकही आहेत. या सर्वांनी आपल्या प्रयत्नांनी कुंभ परिसरातील केलेली स्वच्छता जगभरात चर्चेचा विषय झाला आहे, असेही मोदी म्हणाले. तसेच आज मी सफाई कामगारांचे पाय धुतलेला क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील असेही ते म्हणाले.