Jitendra Awhad : ‘महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करुन सरकार स्थापन केले. त्यामुळे जास्त जागा जिंकून देखील भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी अपवित्र युती असल्याची टीका केली. अमित शाह यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अमित शाह यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका त्यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता ? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला विचारला आहे. जितेंद्र आव्हाड आज (मंगळवार) ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

कुंभमेळ्यावरून आव्हाडांचा भाजपला टोला

कुंभमेळ्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. महाविकास आघाडातील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करुन कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्याने आम्हाला पवित्र ठरवले जात असेल तर ते आम्हला चालेल, असा टोला लगावला.

बोलण्यापेक्षा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करा

ऑक्सिजन, रेमडेसीवीर तुटवड्यावरून आव्हाड यांनी यावेळी भाजपला चांगलेच धारेवर धरले. आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा जबरदस्तीने कमी केला तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले जात आहे ते बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुप्पट देवू नका. परंतु जेवढी गरज आहे तेवढे तरी द्या. महाराष्ट्राचा गळा दाबण्याचे काम करुन महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्या पेक्षा महाराष्ट्रातील माणसं मरणार नाहीत, याकडे जरा लक्ष द्या, अशा शब्दात आव्हड यांनी भाजपला सुनावलं.

अमित शाह काय म्हणाले होते ?

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार संदर्भात भाष्य केले होते. अमित शाह म्हणाले होते, शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, असे अमित शहा म्हणाले होते.