‘माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बडया नेत्याचा बाबा रामदेव यांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधलं होतं. यावर संतप्त प्रतिक्रिया देत रामदेव बाबांनी लवकरात लवकर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्याविषयी आव्हाड यांनी संताप व्यक्त करताना ट्विट करत एक व्हिडिओही शेयर केला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवर म्हंटल आहे की, ‘जातीनिर्मूलनाचे काम करणारे डॉ. आंबेडकर आणि पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांना रामदेवबाबा वैचारिक दहशदवादी म्हणतो हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, रामदेव बाबाने लवकरात लवकर माफी मागितली नाही तर त्याला महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही.’

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सानपाडा येथील पतंजलीच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. बाबा रामदेव यांनी 72 तासात या प्रकरणावर माफी मागितली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने समजवून सांगू, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

काय म्हणाले होते रामदेवबाबा
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत रामदेव बाबा म्हणाले होते की, ‘ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक देश, एक कायदा, जातीमुक्त भारत, समानता न्याय या संकल्पांचा मी चाहता आहे. मात्र, महापुरूषांचे अनुयायी खतरनाक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी भेदभाव पाळत नाही. मी दलितांना आचारी, संन्यासी बनवलं. शिक्षणसंस्थेचं प्रमुख केलं. पण आता दुरावा निर्माण केला जात आहे. वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवं.’

Visit :  Policenama.com