जेएनयू देशद्रोह प्रकरण : कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी दिल्ली जिल्हा कोर्टाने दिल्ली पोलिसांना खडसावले आहे. विधी विभागाकडून संमत्ती न घेता कसे काय आरोपपत्र दाखल केले अशी विचारणा कोर्टाने केली आहे.
दिल्ली पोलिसांनी १४ जानेवारीला कन्हैय्या कुमार, उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याविरुद्ध देशद्रोही घोषणा देण्यात आलेल्या सभेचे नेतृत्व आणि समर्थन केल्याचा ठपका ठेवत देशद्रोहाचे आरोपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात जेएनयूतील विद्यार्थी नेतेे कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांच्यासह १० जणांचा समावेश करण्यात आला आहे.
जेएनयूमध्ये २०१६ ला कन्हैयाकुमारच्या भाषणावेळी देश विरोधी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी दिल्ली पोलसांनी काही दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल केले होते. शनिवारी दिल्ली जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरु झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रावर विधी विभागाची १० दिवसांच्या आत संमत्ती घेण्यात येईल असे सांगितले. त्याच्यावर न्यायाधीश दीपक शेरावत यांनी तुम्ही संमत्तीशिवाय कसे काय आरोपपत्र दाखल केले अशी विचारणा केली. तुमच्याकडे विधी विभाग नाही का ? असे खडे बोलही सुनावले.
काय आहेत आरोप ?
परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन करणे
सुरक्षा यंत्रणांनी कार्यक्रम थांबवल्यानंतरही तो सुरूच ठेवणे
या कार्यक्रमाचे नेतृत्व केल्याचा ठपका कन्हैया कुमारवर
निषेध आणि आक्रमक घोषणाबाजी करणे