मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कर्मचारी भरतीला चालना दिली जात आहे. विविध विभागांमध्ये कर्मचारी भरती केली जात आहे. नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळ वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्याची घोषणा सरकारने केली आहे. याशिवाय भारतीय रेल्वेनंही बेरोजगारांना संधी देण्यासाठी भरती सुरु केली आहे. या संदर्भात एका वेबसाईटने वृत्त दिले आहे.
एकूण जागा आणि अर्ज करण्याची अंतीम मुदत
रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय रेल्वे तांत्रिक आणि आर्थिक सेवांविभागानं अॅप्रेटिस पदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 146 पदांची भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 एप्रिलपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 मे 2021 आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो.
कोठे करायचा अर्ज
उमेदवारांनी 12 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी एनएटीएस पोर्टल किंवा mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. यानंतर [email protected] वर अर्ज पाठवायचे आहेत.
पात्रता
एकूण 146 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग डिग्री, डिप्लोमा, आयटीआय आणि इतर पदवीधर यांच्यासाठी वेगवेगळ्या जागा उपलब्ध आहेत.
इंजिनीअरिंग डिग्री अर्थात अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी 76, पदवीधर उमेदवारांसाठी 20, इंजिनीअरिंग डिप्लोमा अर्थात अभियांत्रिकी पदविका प्राप्त उमेदवारांसाठी 15 तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 35 जागा उपलब्ध आहेत. त्या त्या विभागातील पदासाठी आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड आवश्यक पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी जारी करण्यात आलेले अधिकृत नोटिफिकेशन वाचावे.
स्टायपेंड
या पदासाठी पदवीधर अप्रेंटिसला दरमहा 14 हजार रुपये, डिप्लोमा धारकांना 12 हजार तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवाराला 10 हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल.