आसामला पुराने घातला विळखा; जॉन अब्राहम करतोय मदतीची विनंती

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना आसाम दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत 85 जणांनी प्राण गमावले आहेत. आसाममध्ये आलेल्या या संकटावर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने प्रतिक्रिया दिली आहे.

जॉनने आसाममधील परिस्थितीचे फोटो ट्विट करुन त्यांना त्वरित मदत करावी अशी विनंती देशवासीयांना केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील 28 जिल्ह्यातील 33 लाख नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसला आहे. दरम्यान एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने 21 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे अद्याप आसामसमोरचे संकट गडद झाले आहे. गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर, धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरुप,मोरीगाव, नागाव या महत्वाच्या जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे काही भागांत भुस्खळलानाचेही प्रकार घडले आहेत, त्यामुळे काही लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.