‘चला तयारीला लागा, राज्यात कोणाच्याही मदतीशिवाय सत्तेत आलं पाहिजे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कोणाचीही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा, असे आदेशच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. आज भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे व्हर्च्युअली घेण्यात आली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते हजर होते. यावेळी अध्यक्ष जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कौतुक करताना म्हटले की, अशी बैठक कधी होईल असं वाटलं नव्हतं. पण गरज हीच शोधाची जननी आहे. हे कौशल्य पण आपण चांगलं आत्मसात केलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्र भाजपने खूप चांगले काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे राज्य सरकारला चांगलेच उघडे पाडले आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्रात स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे सरकार आहे. या सरकारने कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे लोकांसमोर आले पाहिजेत, असे जेपी नड्डा म्हणाले.

तर राष्ट्रीय अध्यक्षांनी कोरोनाच्या काळात देशाला एकही माणूस उपाशी राहणार नाही, असं म्हटलं होतं. मला त्यांनी 52 लाखांचे टार्गेट दिले होते. मला ते अशक्य वाटलं होतं. पण ते मला म्हणाले, मी तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव करुन देतोय. त्यामुळे आपण राज्यात दोन कोटी 88 लाख लोकांना फूड पॅकेट वाटप करू शकतो, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
तसेच, सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार केला, प्रेताच्या टाळूवरचं लोणी करण्याचा प्रयत्न केला. यातील भ्रष्टाचार पुणे आणावा लागेल. सरकार येईल ना येईल या चर्चेत जाऊ नका. देवेंद्र फडणवीस हे काही सांगतील. पण, कोणत्याही आरोपाला प्रत्युत्तर द्या. कुणी टरबूर, कोणी चंपा म्हणतंय, कोणी कुत्रा म्हणतंय अशी खालच्या भाषेची टीका होत आहे. फक्त त्यात भाषा चांगली वापरा, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.