दु:ख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे उतरले ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन :  दु:ख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे करोनाविरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. नुकतेच त्यांच्या आई शारदा यांचे शनिवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. मात्र, मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवून पुन्हा एकदा करोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री उतरले आहेत. आईच्या निधनानंतर चौथ्या दिवशी टोपे यांनी काम सुरू केले.

राजेश टोपे यांच्या आई शारदा यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मूळगावी अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होऊ नये, म्हणून त्यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण केले. त्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता फेसबुकवरून अंत्यदर्शन घेऊन आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन टोपे यांनी केले होते.

त्यानुसार, करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून त्यांच्या आईंवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राजेश टोपे पुन्हा कामावर हजर झाले.

मंगळवारी संध्याकाळी त्यांनी जालन्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तर, बुधवारी मुंबईमध्ये आल्यानंतर दैनंदिन बैठका घेतल्या. आईने आशीर्वाद दिला होता. त्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलोय, अशी भावना त्यांनी टोपे व्यक्त केलीय.

काळाबरोबर जाणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता, म्हणून आईच्या निधनानंतर 14 दिवसांचा दुखवटा न पाळता या कोरोना काळातील विधी तीन दिवसांत केले. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात. समाजाचे नेतृत्व करणार्‍यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही राजेश टोपे म्हणाले.