मंत्रिमंडळ विस्तारावरून ‘महाराज’ खूष पण उमा भारती ‘कोपल्या’, ज्योतिरादित्यांच्या भात्यात 14 मंत्री

भोपाळ : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले महाराज ज्योतिरादित्य शिंदे या विस्तारातून ‘अमृत’ घेऊन गेले असून मुखमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हातात केवळ ‘विष’ उरले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या उपाध्यक्ष असलेल्या उमा भारती मात्र यावर चांगल्याच भडकल्या आहेत. जातीय संतुलन राखले नसल्याने त्यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी पक्षाच्या नेतृत्वालाही परखड शब्दात पत्र लिहलं आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडून पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. मागील महिनाभर दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेल्या शिंदे यांना राज्यसभेची खासदारकी मिळताच त्यांना राज्य सरकारमध्येही चांगले वजन मिळाले आहे. यावर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून आल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली होती. महामंथनातून अमृत निघाले होते, पण भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, असे ते म्हणाले होते. आता तेच खरे होताना पहायला मिळत आहे.

मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी (दि.2) सकाळी 11 वाजता राजभवनामध्ये 28 आमदारांना शपथ देण्यात आली. यामध्ये 20 कॅबिनेट आणि 8 राज्य मंत्री आहेत. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते दिले हे अद्याप गुलदस्त्यात असून यामध्ये शिंदे समर्थकांना झुके माप देण्यात आल्याने पक्षामध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

आज बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची लखनऊ विशेष न्यायालयामध्ये सनावणी होती. यावेळी साध्वी उमा भारती न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी लखनऊला आल्या होत्या. उमा भारती यांनी बुधवारी पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच मंत्रिमंडळामध्ये जातीय असंतुलन नीट करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीला महत्त्व देण्यात आले नाही.
टायगर अभी जिंदा है

कमलनाथ सरकारमध्ये शिंदे यांच्या वाट्याला सहा मंत्रीपदेच आली होती. आता शिंदे यांच्या वाट्याला 14 मंत्रीपद आली आहेत. मंत्र्यांचा शपथविधी होताच शिंदे यांनी काँग्रेसचे नाव न घेता ‘टायगर अभी जिंदा है’ अशा शब्दात इशारा दिला आहे. आज शपथ घेतलेल्या 28 मैत्र्यांपैकी 11 मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत. तर आधीच्या मंत्रिमंडळात तीन मंत्री हे शिंदे यांचेच आहेत.