‘कडकनाथ’ घोटाळ्याचा पहिला बळी, कोल्हापूरातील तरुण शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या रयत अ‍ॅग्रो संस्थेकडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश्य आलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रमोद जमदाडे असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पन्हाळा तालुक्यातील माले या गावाचा हा तरुण असून त्याने रयत अ‍ॅग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता. तसेच पन्हाळा तालुक्यातील गुंतवणूकदारांचे नेतृत्वही तो करत होता.

प्रमोद जमदाडे याने वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत अ‍ॅग्रोकडे अडीच लाख रुपये भरले होते. त्याने शेड आणि अन्य खर्च करण्यासाठी अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत अ‍ॅग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचे मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे तो नैराश्यात होता. यातूनच त्याने शनिवारी विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूकीचा प्रमोद पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे रयत अ‍ॅग्रो कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रमोदच्या मृत्यूची बातमी समजताच गुंतवणूकदार आणि नातेवाईकांनी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात धाव घेतली. गुंतवणूकदारांनी रयतचा प्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –